फायनान्स कंपनीच्या वारंवार पैशाच्या मागणीला कंटाळून कनोलीतील गळफास घेऊन आत्महत्या
संगमनेर / लोकवेध live न्यूज
फायनान्स कंपनीकडे वारंवार केल्या जात असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
दीपक दादासाहेब बलसाने असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांना त्या दृष्टीने तपास करावा लागणार आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी बलसाने याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपण फायनान्स कंपनीला वारंवार पैसे दिले मात्र फायनान्स कंपनीतील कर्मचारी आपल्याकडे वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे या मागणीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान आत्महत्या करणाऱ्या बलसाने याला घटनेपूर्वी संगमनेर शहरातील एका हॉटेल मध्ये मारहाण करण्यात आली होती. त्या ठिकाणी माझ्या खिशातील सर्व कागदपत्रे काढून घेण्यात आले असून या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोट मध्ये आहे.
सुसाईड नोटमध्ये केवळ नावांचा उल्लेख करण्यात आला असून आडनावांचा आणि नेमक्या कोणत्या फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली याचा उल्लेख नसल्याने चिठ्ठीत उल्लेख केल्याप्रमाणे शेखर आणि त्याचा साहेब गाडे यांचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे. त्यानंतर हा प्रकार उघडा पडू शकतो
आश्वी पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली
असून यातील दोर्षीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्याच्या कुटुंबाने घेतला आहे. मृत दीपक बलसाने यांचा भाऊ अविनाश बलसाने याने या प्रकरणातील दोषी आरोपींवर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या घटनेची माहिती मिळताच कनोली गावचे पोलीस पाटील नानासाहेब वर्षे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान याप्रकरणी सखोल तपास करून दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ
वाघचौरे यांच्याकडे मातंग एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी व विविध संघटनांनी
निवेदनाद्वारे केली आहे.
