विखे-थोरात यांच्यावर सीआयडी चौकशीची मागणी; आत्माराम देशमुख यांचे निवेदन
संगमनेर, प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील आत्माराम गजानन देशमुख यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात सीआयडीमार्फत सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात देशमुख यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर उद्योग आणि विकासकामांमध्ये कथित भ्रष्टाचार, गैरव्यवहार व भोंदूगिरी होत असल्याचा आरोप केला आहे. काही खाजगी साखर कारखानदार शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करून स्वतःचे साम्राज्य उभे करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
डॉ. पद्मश्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ उभी केली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत काही प्रभावशाली नेत्यांमुळे लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होत असल्याचेही देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.
संबंधित प्रकरणाची सीआयडीमार्फत निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
– आत्माराम गजानन देशमुख, पिंपरणे (ता. संगमनेर) यांनी शासनाकडे केलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे.
