हुकूमशाही रोखण्यासाठी काँग्रेसचा लढा – बाबा ओहोळ

शिर्डी येथील काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत भाजपवर आरोप

शिर्डी / संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकवेध live न्यूज 

अनेक राष्ट्रपुरुषांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. काँग्रेसच्या विचारांवरच लोकशाही समृद्ध होताना देशाची प्रगती झाली आहे. मात्र मागील नऊ वर्षांपासून सत्तेवर आलेले भाजपा सरकार हे हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून ही हुकूमशाही थांबवण्यासाठी काँग्रेसचा लढा असून काँग्रेसचा विचार हा सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले आहे.

शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे राहता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. या प्रसंगी काँग्रेस नेते सुरेश थोरात, तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, शहराध्यक्ष सचिन चौगुले, शिवसेना तालुकाध्यक्ष सचिन कोते, शरद भदे, सोमनाथ गोरे, रिंकेश जाधव, शिवाजी जगताप, संजय जेजुरकर, सुरेश आरने, संतोष वाघमारे,  योहान गायकवाड , शहानवाज मणियार कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबा ओहोळ म्हणाले की, काँग्रेसला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसच्या विचारांवरच देशाची प्रगती झाली आहे. ज्या देशांमध्ये सुई बनत नव्हती तेथे रॉकेट बनणे सुरू झाले आहे. महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. ती काँग्रेसच्या विचारांवरच मात्र मागील नऊ वर्षापासून सत्तेवर आलेले भाजप सरकार ही हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहे. विकासाच्या योजना पूर्णपणे थांबलेल्या आहेत. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून दहशत निर्माण केली जात आहे. देशाची सार्वजनिक संपत्ती काही विशिष्ट भांडवलदारांना दिली जात असून याविरुद्ध राहुल गांधी यांनी आवाज उठवला तर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे ऐवजी भाजपाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे.

सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलणे सुद्धा आता गुन्हा होऊ लागला आहे. यामुळेही हुकूमशाही रोखण्याकरता काँग्रेसच्या वतीने जनआंदोलन सुरू झाले आहे. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मोठे आंदोलन करणार असून हे आंदोलन जनसामान्यांच्या हिताकरता व लोकशाहीच्या रक्षणासाठी असल्याचे ही ते म्हणाले.

सुरेश थोरात म्हणाले की संपूर्ण देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे. लोक भाजपाला कंटाळले आहेत. हुकूमशाही नको आहे. तरुणांमध्ये राहुल गांधी यांची मोठी लोकप्रियता झाली आहे. हीच भाजपाच्या लोकांना सहन होत नाही. आगामी काळ हा काँग्रेसचाच असून सर्वांनी एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी तालुकाध्यक्ष पंकज लोंढे, सचिन चौगुले,सचिन कोते यांनीही मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!