ऊसतोड मजुरांच्या ३ झोपड्या जळून खाक

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे घडली घटना

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे कोप्या करून राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या ३ झोपड्या अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. ) सकाळी १० वाजता लागलेल्या आगीत ३० हजाराच्या रोकडसह संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. चाळीसगाव येथील ऊसतोड मजूर दगडू सुखदेव पगारे, भारत रामा निकम, नाना भारत निकम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी येथे आले आहे. ते समनापूर येथे झोपड्या घालून राहतात. मंगळवारी पहाटे हे मजूर तालुक्यातील रहिमपूर येथे ऊसतोडीसाठी गेले होते. घरी एक वृद्ध महिला होती. अचानक लागलेल्या आगीमध्ये ३० हजाराची रोकड, दागिने व संसारपयोगी साहित्य आगीत जळून गेले. यामुळे जवळपास २ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने वृद्ध महिलेला काही झाले नाही. आग लागताच शेजारी राहणारे इर्शाद इनामदार, योगेश शरमाळे, इरफान इनामदार, शरद भास्कर, बारकू शरमाळे, वाजिद इनामदार व ऊसतोड मजुरांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. थोरात कारखान्याच्या अग्निशमन बंबाला यावेळी प्राचारण करण्यात आले. मात्र, तोवर आग आटोक्यात आली होती. यामुळे आजूबाजूच्या झोपड्या आगीपासून बचावल्या. झोपडीतील चुलीच्या विस्तवाने आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तलाठी संतोष लंके, मनोज मंडलिक यांनी घटनेचा पंचनामा केला. जळीत झोपडीतील ऊसतोड मजुरांना भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!