*अस्वस्थ करणारे प्रश्न, जागृत करणारे विचार : ‘कुठे आहे लोकशाही?’*
मराठी साहित्यात समाजप्रबोधनाची परंपरा संत साहित्यापासून ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेपर्यंत अखंडपणे प्रवाहित होत आलेली आहे. या परंपरेचा वारसा जपत तरुण लेखक बुद्धभूषण कांबळे यांनी लिहिलेला “कुठे आहे लोकशाही?” हा ललित लेखसंग्रह समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारा, विचारांना चालना देणारा आणि वाचकाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरतो. पुस्तकाचा केंद्रबिंदू लोकशाही असला तरी त्यामध्ये केवळ राजकीय लोकशाहीचा विचार नाही; तर सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांच्या लोकशाहीचाही शोध घेतला आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ सरदार जाधव यांनी रेखाटले असून ते अत्यंत आकर्षक आणि बोलके आहे. प्रस्तावना किर्तनकार व साहित्यिक माधव डाके यांची असून महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांचा अभिप्राय लाभला आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर ज्येष्ठ साहित्यिक भरत सातपुते यांची पाठराखण आहे.
या लेख संग्रहात लेखकाने समाजातील विविध समस्या, मानवी नातेसंबंध, शिक्षण, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, पर्यावरण, बेरोजगारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे नाते, मतदानाचे महत्त्व, स्त्रीभ्रूणहत्या, मोबाईलचा अतिरेकी वापर अशा अनेक विषयांवर परखडपणे भाष्य केले आहे. “कुठे आहे लोकशाही?”, “बेरोजगारी एक भीषण समस्या”, “मोबाईलचा अति वापर धोकादायक”, “विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार”, “अंधश्रद्धेच्या विळख्यात भारत” यांसारखे लेख समाजातील वास्तवाला स्पर्श करतात.
लेखकाची लेखनशैली ही या पुस्तकाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. अवघड आणि क्लिष्ट शब्दांचा अतिरेक न करता साध्या, सरळ आणि प्रभावी भाषेत त्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य वाचकापासून ते सुशिक्षित वाचकांपर्यंत प्रत्येकाला हे लेख सहज समजतात. प्रत्येक लेखात सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि परिवर्तनाची तळमळ प्रकर्षाने जाणवते. लेखक केवळ समस्या मांडून थांबत नाही, तर त्या समस्यांवर विचार करण्यास आणि उपाय शोधण्यासही प्रवृत्त करतो.
“कुठे आहे लोकशाही?” या शीर्षक लेखात लोकशाहीच्या मूळ मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदानाच्या वेळी पैशाच्या आणि प्रलोभनांच्या आधारे मतांची खरेदी-विक्री होत असल्याने लोकशाहीचा आत्माच हरवत चालल्याची खंत लेखक व्यक्त करतो. लोकप्रतिनिधी निवडताना नागरिकांनी सजग राहण्याची आवश्यकता तो अधोरेखित करतो. हा लेख वाचताना लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती जबाबदार नागरिकत्वाची जीवनपद्धती आहे, याची जाणीव होते.
या पुस्तकातील लेखांमध्ये मानवी मूल्यांविषयीची आस्था विशेषत्वाने दिसून येते. आजच्या स्वार्थी आणि स्पर्धात्मक युगात माणुसकी, परस्पर प्रेम, कृतज्ञता, नाती जपण्याची भावना आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची गरज लेखक वारंवार अधोरेखित करतो. “जीवनात माणसे जपायला शिका”, “माणूस माणसासारखा का वागत नाही?” यांसारखे लेख मानवी संवेदनांचा शोध घेतात. त्यामुळे हा संग्रह केवळ लेखांचा संच राहत नाही, तर जीवनमूल्यांचा मार्गदर्शक ठरतो.
लेखकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत परंपरा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. समाजातील अंधश्रद्धा, विषमता, अन्याय आणि अज्ञान यांविरुद्ध लेखकाने निर्भीडपणे आवाज उठवला आहे. त्याचवेळी शिक्षण, विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिकता यांचे महत्त्वही पटवून दिले आहे. त्यामुळे पुस्तकाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. एकंदरीत, “कुठे आहे लोकशाही?” हा लेखसंग्रह आजच्या समाजाचे वास्तव चित्रण करणारा, सामाजिक जाणीवा जागृत करणारा आणि मूल्याधिष्ठित जीवनाची दिशा दाखवणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. तरुण वयात लेखकाने दाखवलेली सामाजिक बांधिलकी, निरीक्षणशक्ती आणि प्रबोधनाची तळमळ निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजातील बदलत्या प्रवाहांचे चिकित्सक विश्लेषण करणारे हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि जागरूक नागरिकाने अवश्य वाचावे असे आहे. वाचकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून त्याला विचारांच्या नव्या क्षितिजाकडे घेऊन जाण्याची ताकद या पुस्तकात आहे. म्हणूनच “कुठे आहे लोकशाही?” हा केवळ लेखसंग्रह नसून समाजपरिवर्तनाची हाक देणारा एक प्रभावी वैचारिक दस्तऐवज आहे. साध्या सरळ सोप्या भाषेत असलेले या पुस्तकातील त्यांचे लेख ही आपलेपणाची भाषा वाटते. या पुस्तकात अलंकारिक रचना किती आहे यापेक्षा माणुसकीचा अलंकार इथे समृद्ध व सजग आहे. बाबासाहेबांचे आचार व विचार, बाबासाहेबांचा आदर्श हा अनेक लेखात बुद्धभूषण कांबळे यांनी मांडला आहे तो विचार प्रत्येकाच्या आचरणात आला तर इथली लोकशाही समृद्ध होईल असे वाटते. असो, कांबळे यांच्या या लेख संग्रहाच्या माध्यमातून त्यांनी पोटतिडकीने मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळायला हवीत असे मनोमन वाटते. शेवटी त्यांनी लिहिलेला हा लेख संग्रह वाचकांच्या पसंतीस नक्की उतरेल असा विश्वास वाटतो.
*पुस्तकाचे नाव :-* कुठे आहे लोकशाही?
*लेखक :-* बुद्धभूषण कांबळे
*पृष्ठे :-* २४०
*किंमत :-* ४५०/- रुपये

*- पुस्तक परीक्षण*
सुरेश मंत्री, अंबाजोगाई (९४०३६५०७२२)
