‘ *नका करू माणुसकीचा अंत’ : माणुसकीच्या दीपस्तंभाची शब्दयात्रा*

माणुसकीचा दिवा तेवत ठेवा,
स्वार्थाच्या वाऱ्यांनी तो विझू देऊ नका;
जगण्याला अर्थ द्यायचा असेल,
तर माणसातला माणूस मरू देऊ नका.”

आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि स्वार्थाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समाजात माणुसकी, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. अशा काळात समाजाला अंतर्मुख करणारे, आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारे आणि माणुसकीचा दीप पुन्हा प्रज्वलित करणारे पुस्तक म्हणजे युवा लेखक बुद्धभूषण कांबळे यांचा ‘नका करू माणुसकीचा अंत’ हा ललित लेखसंग्रह होय. या पुस्तकातून लेखकाने समाजातील विविध प्रश्नांना केवळ स्पर्श केला नाही, तर त्यावर मनाला भिडणाऱ्या शब्दांत भाष्य केले आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती २०२६ मध्ये प्रकाशित झाली असून, त्यात एकूण ६९ वैचारिक लेखांचा समावेश आहे.
मुखपृष्ठावरील अक्राळविक्राळ जबड्यात झुंज देणारा माणूस आजच्या समाजातील अमानुष प्रवृत्तींचे प्रभावी प्रतीक ठरतो, तर ठळक अक्षरांतील ‘नका करू माणुसकीचा अंत’ हे शीर्षक मानवतेच्या रक्षणासाठी दिलेली आर्त साद वाटते. मलपृष्ठावरील स्तंभलेखक व पञकार सुरेश मंत्री यांची पाठराखण वाचकाला पुस्तकाच्या विचारविश्वाची ओळख करून देते. आशयाला साजेशी ही कल्पक मांडणी पुस्तकाचे आकर्षण अनेकपटींनी वाढवते.
या संग्रहातील प्रत्येक लेख हा समाजमनाला प्रश्न विचारतो. मतदानातील पैशांचे राजकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न, पालक व मुलांचे नाते, व्यसनाधीनता, स्त्री-सन्मान, शिक्षण, नैतिकता, सामाजिक जबाबदारी, माणुसकी आणि राष्ट्रप्रेम अशा अनेक विषयांवर लेखकाने अत्यंत साध्या, ओघवत्या आणि प्रभावी भाषेत विचार मांडले आहेत. पुस्तकातील लेख उपदेशात्मक न वाटता अनुभवातून आलेले जीवनदर्शन घडवतात.
लेखकाची भाषा ही या पुस्तकाचे मोठे वैशिष्ट्य आहे. कोणताही शब्दांचा बडेजाव नाही, कृत्रिम अलंकार नाहीत; पण प्रत्येक वाक्यात प्रामाणिकपणा, सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा स्पर्श आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना लेखक वाचकाशी प्रत्यक्ष संवाद साधत असल्याचा भास होतो. विचारांच्या ओघात अनेक ठिकाणी अंतर्मुख करणारे प्रश्न वाचकास स्वतःलाच विचारायला भाग पाडतात. या पुस्तकातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे लेखकाची सकारात्मक दृष्टी. समाजातील वाईट प्रवृत्तीवर कठोर शब्दांत टीका करतानाच त्या बदलण्यासाठी आशेचा किरणही तो दाखवतो. म्हणूनच हे पुस्तक केवळ समस्यांचे चित्रण करत नाही, तर परिवर्तनाचा मार्गही सुचवते. पुस्तकाच्या प्रस्तावनेतही लेखकाच्या विचारांना “माणुसकीचा सुगंध” लाभल्याचे नमूद करण्यात आले आहे, हीच त्याच्या लेखनाची खरी ओळख आहे.
विशेष म्हणजे लेखकाचे वय तरुण असले तरी त्याच्या विचारांमध्ये विलक्षण सामाजिक परिपक्वता दिसून येते. ग्रामीण वास्तव, सामान्य माणसांचे दुःख, आई-वडिलांविषयीची कृतज्ञता, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजाविषयीची बांधिलकी या मूल्यांचा ठसा प्रत्येक लेखावर उमटलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ तरुणांसाठीच नव्हे, तर शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजजीवनाशी निगडित प्रत्येक व्यक्तीसाठी मार्गदर्शक ठरते.
साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिले तर ‘नका करू माणुसकीचा अंत’ हा केवळ लेखसंग्रह नाही; तर तो सामाजिक प्रबोधनाचा दस्तऐवज आहे. लेखकाची निरीक्षणशक्ती, अनुभवांचे सूक्ष्म विश्लेषण आणि प्रभावी अभिव्यक्ती यांमुळे प्रत्येक लेख वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळतो. वाचन संपल्यानंतरही पुस्तकातील विचार मनात सतत घोळत राहतात, हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे. आज समाजात तुटत चाललेली नाती, वाढत चाललेला स्वार्थ आणि कमी होत चाललेली संवेदनशीलता यांच्यामध्ये हे पुस्तक माणुसकीचा हात धरायला शिकवते. ते केवळ वाचण्याचे पुस्तक नाही, तर जगण्याचे भान देणारे पुस्तक आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते—
“माणुसकीचा श्वास जिवंत असेल,
तरच समाजाचे अस्तित्व टिकेल;
शब्दांना कर्माची जोड मिळाली,
तरच जीवन खऱ्या अर्थाने फुलेल.”
‘नका करू माणुसकीचा अंत’ हा लेखसंग्रह सामाजिक जाणिवा समृद्ध करणारा, नैतिक मूल्यांची आठवण करून देणारा आणि प्रत्येक वाचकाला स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्यास भाग पाडणारा महत्त्वपूर्ण साहित्यसंच आहे. विचारशील वाचकाच्या संग्रहात असावे, असे हे प्रेरणादायी पुस्तक आहे.
*पुस्तक परीचय :-*
सुरेश मंत्री, अंबाजोगाई (९४०३६५०७२२)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!