स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी आत्माराम देशमुख यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
संगमनेर | प्रतिनिधी
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी संगमनेर येथील श्री. आत्माराम गजानन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
येत्या हिवाळी अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव मांडून तो मंजूर करण्यात यावा. त्यानंतर केंद्र सरकारची आवश्यक परवानगी घेऊन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
“अभी नहीं तो कभी नहीं”, “इस जिंदगी का क्या भरोसा, आज है कल नहीं” अशा भावनिक शब्दांत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले असून, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करणे ही आता राज्य नेतृत्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या मागणीची शासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती श्री. आत्माराम गजानन देशमुख यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.
