353 कलमातून पत्रकारांना वगळावे अन्यथा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघकरणार राज्यव्यापी आंदोलन
शिर्डी / लोकवेध live न्यूज
राज्यात अनेक सरकार आले आणि गेले मात्र पत्रकार आजही उपेक्षित राहिला आहे. पत्रकारांच्या असंख्य समस्या असतांना पत्रकारितेला दाबण्यासाठी अनेक वेळा ३५३ कलमाचा दुरुपयोग केला जात असल्याचे दिसून येत आहे यांनाही कलमातून पत्रकारांना वगळण्यात यावे यासाह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 10 जुलै पासून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिली.
निकम हे शिर्डी येथील हॉटेल साई गोल्ड येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पत्रकार मेळावा उत्साहात संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई, प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील, शिक्षण अधिकारी डॉ. विलास देशमुख, पोलीस अधिकारी लाड, प्रदेश पदाधिकारी प्रफुल्ल मेश्राम, सोमनाथ मानकर, संतोष अहिरे विजय केदारे, सुकुमार वांजुळे, रेणुका पगारे रुपेश वराडे, के के चव्हाण व राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थितीत होते.
पत्रकारांवर सातत्याने होणारे भ्याड हल्ले रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई यांनी सांगितले.
प्रदेश संपर्क प्रमुख प्रफुल्ल मेश्राम यांनी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची भुमिका व कार्यक्षेत्र या विषयी माहिती दिली, उत्तर महाराष्ट्र संघटक मनोहर देसले यांनी पत्रकारांनी राज्यघटनेच्या चौकटीत राहून निर्भिडपणे पत्रकारीता कशी करावी या संदर्भात माहिती दिली.
पोलीस अधिकारी लाड यांनी पत्रकारांनी पोलिसां सोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे आवाहन केले.
शिक्षण अधिकारी विलास देशमुख यांनी सांगितले की पत्रकारांनी विशिष्ट चौकटीत न राहता बाह्यजगताचा अभ्यास करून समाजाच्या विविध स्तरातील पिडीत घटकाला न्याय देण्यासाठी सज्ज कसे राहिले पाहिजे या विषयावर मार्गदर्शन केले.
नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व या दोन दिवसीय कार्यशाळा आणि पत्रकार मेळाव्यात सहभागी असणाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी राज्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. योगेश बारहाते व मनोहर मेहेरखांब यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
