पुणे येथे शानदार कार्यक्रमात पुरस्कार प्रदान
संगमनेर / लोकवेध live न्यूज
पुणे येथील स्व.ॲड.सोपानराव मारुती धोर्डे पाटील यांच्या स्मरणार्थ धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहराच्या नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांना आदर्श माता जीवन गौरव पुरस्काराने राजस्थान हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश संभाजीराव शिंदे पा. यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष पद्मश्री परशुरामजी खूने, अतिरिक्त महासंचालक यशदा आयएएस अधिकारी शेखर गायकवाड, विधान परिषदेतील युवा आमदार सत्यजित तांबे, औरंगाबाद हायकोर्टातील ॲड रमेशराव धोर्डे पाटील, जिल्हा सत्र न्यायालयाचे ॲड विलासराव धोर्डे पाटील , सुभाषराव देशमुख, अशोकराव काकडे ,उत्तम सिंग पवार, गणेश निवे ,रेश्मा पुणेकर, निखिल चिटणीस यांचा विविध मान्यवर उपस्थित होते. शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सौ दुर्गाताई तांबे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि मातोश्री सौ.मथुराबाई थोरात यांच्या संस्कारातून काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांना समाजकार्याचे बाळकडू मिळाले. सौ.दुर्गाताई तांबे यांनी जय हिंद महिलांच्या माध्यमातून खेडोपाडी महिलांचे संघटन करून महिला सबलीकरणाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली. याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना गोरगरीब, आदिवासी ,अपंग, मूकबधिर यांच्यासाठी काम केले. ऐतिहासिक संगमनेर नगरपालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी स्वच्छतेवर अधिक भर दिला. संगमनेर शहरात मोठमोठ्या विकास कामांसह सुशोभीकरणासह विविध उपक्रम राबवल्याने शहराला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील केंद्र व राज्य सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
साहित्य क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले असून दोन पुस्तकांची निर्मिती केली आहे.त्यांच्या या सातत्यपूर्ण कामाची दखल घेऊन त्यांना राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचा पुरस्कार ,यशवंत वेणू पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कारानंतर सौ दुर्गाताई तांबे म्हणाले की हा पुरस्कार संपूर्ण संगमनेर तालुक्यातील जनतेचा आहे. सर्वसामान्यांसाठी अविश्रांत काम करणे हीच आपली परंपरा असून त्यातूनच जीवनाचा खरा आनंद मिळत आहे या पुरस्काराने काम करण्यास आणखी ऊर्जा मिळणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

