गेली दहा वर्षे आपण आतुरतेने ज्याची वाट बघत होतो व जे जाहीर करण्याची सरकारकडे सतत मागणी करत होतो, ते राज्याचे मराठी भाषा धोरण बुधवार दि. १३ मार्च २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली. मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे जो लढा सुरू होता त्यास अखेर यश मिळाले असल्याची भावना डॉ. जोशी यांनी व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त करत अभिनंदन करण्यात आले असून केसरकर यांनी ते स्वीकारले असल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ६३ वर्षाच्या इतिहासातील मराठी भाषेच्या जतन, संवर्धनाच्या दृष्टीने ही अतीव महत्वाची घटना आहे. शासनाने आता या धोरणानुसार त्याला प्रत्यक्ष अंमल देणाऱ्या, धोरणात सुचवलेल्या यंत्रणा, संस्था उभारून अहवालानुसार मराठी विषयक निर्णय घेणाऱ्या सर्व कृती यापुढे या धोरणानुसारच राबवाव्यात तसेच मराठी भाषा जतन संवर्धनाप्रती आपली ठाम बांधीलकी आणि राजकीय इच्छा शक्ती दाखवावी अशी प्रतिक्रिया प्रमुख संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे पूर्वाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सदस्य, राज्य भाषा सल्लागार समितीचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली.