आश्वी बु.अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा
आमदार सत्यजित तांबे यांची विधान परिषदेत मागणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत मागणी करताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार झाला आहे. अनेक दिवसांच्या कामातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊन संगमनेर तालुका हा सहकार, शिक्षण, सामाजिक सलोखा यातून राज्यासाठी आदर्शवत ठरला आहे. मात्र काही राजकीय उद्देश ठेवून प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे.
तालुक्यातील जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाच्या वतीने आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्मितीचा घाट घातला जात आहे. हा तयार केलेल्या प्रस्ताव अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदारपणाचा आहे. यामध्ये ज्या गावांना जोडण्यात येणार आहे. त्या गावातील नागरिकांना संगमनेर शहर ओलांडून वीस – पंचवीस किलोमीटर पुढे असलेल्या आश्वी बुद्रुक येथे दूर जावं लागणार आहे. त्यामुळे या प्रस्तावित कार्यालय बाबतची बातमी समजताच तालुक्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
जनतेची मोठी गैरसोय करणारा आणि तालुक्याची मोडतोड करणारा असा हा अन्यायकारक प्रस्ताव त्वरित रद्द व्हावा याबाबत संगमनेर तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. गावोगाव ग्रामसभा घेऊन हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही असा प्रशासनाला इशारा दिला आहे.
फक्त राजकीय उद्देश ठेवून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली महसूल प्रशासन काम करत असून जनतेच्या अत्यंत गैरसोयीचा असणारा हा अन्यायकारक प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.
प्रस्तावित आश्वी कार्यालय रद्द करण्याबाबत गावोगावी ग्रामसभासह विधान परिषदेतही मागणी
समाविष्ट झालेल्या गावांमधील सर्व गावांनी ग्रामसभा घेऊन आश्वी बुद्रुक येथे होणारे आपर तहसील कार्यालयाला ठाम विरोध दर्शवला आहे. याबाबत जनआंदोलन होणार असून आमदार सत्यजित तांबे यांनी हा अन्यायकारक प्रस्ताव रद्द करावा याबाबत विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आहे.
