घरकुल योजनेच्या नावाखाली वाळूची लूट; शासन दुर्लक्षामुळे संजय मुन्तोडेंचं आमरण उपोषण सुरू!
शिबलापुर / लोकवेध live न्यूज
प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून पर्यावरणाचा आणि महसूल विभागाच्या नियमांचा झपाट्याने उल्लंघन होत असून, या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते संजय तबाजी मुन्तोडे यांनी अखेर शासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
या बेकायदेशीर वाळू उपशाचे घरकुल योजनांच्या नावाखाली खोट्या कागदपत्रांच्या आधारे खुलेआम समर्थन होत आहे. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल मिळविण्यासाठी दाखवलेले अर्ज आणि नोंदी ही खोटी असल्याचे आरोप असून, त्याच्या आडून महिन्यानमहिने प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे.
संजय मुन्तोडे यांनी या प्रकरणात महसूल व पोलिस प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
“बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांना मी स्वतः थांबवून प्रशासनाकडे दिलं, तरीही कोणतीच कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे हे सर्व दुर्लक्षित होत असल्याने आता मी हे उपोषण मागे घेणार नाही.”
— संजय तबाजी मुन्तोडे, सामाजिक🩷 कार्यकर्ते
या उपोषणाला परिसरातील अनेक नागरिकांनीही पाठिंबा दिला आहे. विशेषतः आदर्श शिक्षक दादा यशवंत दातीर, अशोक सांगळे, परवेज शेख, फयाज शेख, वैभव दुशिंग, अभिमन्यू मुन्तोडे, आमीन शेख, प्रदीप मुन्तोडे, गौतम मुन्तोडे, अमोल मुन्तोडे, पप्पू शेख यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुन्तोडेंच्या लढ्याला बळ दिलं आहे.
शासनाची जबाबदारी कुठे?
हा प्रकार प्रशासनाच्या निष्क्रियतेचे लक्षण मानले जात असून, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी या प्रकाराला विरोध दर्शवला आहे. जर शासनाने वेळेत दखल घेतली नाही तर हा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
