“दंडकारण्य अभियानाची सुरेल गीते… पुणे विद्यापीठात पर्यावरण जागृतीचा गजर!”
प्रा. बाबा खरात यांच्या आवाजात पर्यावरण गीते, वृक्षसंवर्धन संस्कृतीचा उठाव वाढवणारा संदेश
पुणे / लोकवेध live न्यूज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिष्काल शिक्षण मंडळाच्या विशेष बैठकीत पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित दंडकारण्य अभियानाचे प्रेरणादायी गीते प्रा. बाबा खरात यांनी सादर करत संपूर्ण वातावरणच जणू हरित संकल्पाच्या स्फुरणात न्हालं. त्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्यांनी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी वर्ग मंत्रमुग्ध झाला.
“दंडकारण्य अभियानामुळे फक्त वृक्षलागवड नव्हे, तर पर्यावरण जपण्याची एक संस्कृतीच तयार झाली आहे,” असे भावनिक उद्गार प्रा. खरात यांनी काढले. ते म्हणाले, “आजच्या पिढीसमोर पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान आहे. वाढते तापमान, पावसाचे अनियमित चक्र, पाण्याची टंचाई या साऱ्यांवर उपाय म्हणजे झाडे लावणे आणि ती जगवणे.”
या अभियानाची सुरुवात २००६ साली थोर स्वातंत्र्यसैनिक व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून झाली. पुढे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात लाखो झाडांचे रोपण झाले. हे अभियान आज सह्याद्री ते सातपुडा पर्यंत विस्तारले आहे.
नुकत्याच सप्तशृंगी गडावर ५५,००० झाडांची भव्य लागवड डॉ. तांबे व दशरथ वर्पे यांच्या पुढाकारातून पार पडली. ही वृक्षसंवर्धन चळवळ विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेमाची नवी उमेद निर्माण करत आहे. पुणे विद्यापीठानेही पर्यावरण विषयक उपक्रमांची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांत जागृती घडवून आणली आहे.
कार्यक्रमास प्रा. डॉ. हरीश नवले, प्रा. चं.का. देशमुख, ॲड. जयश्री शिंदे, जगन्नाथ थोरात, नामदेव कहांडळ यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. चं.का. देशमुख म्हणाले, “स्वच्छतेशिवाय पर्यावरण संवर्धन अपूर्ण आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे विचार आत्मसात केल्यास खऱ्या अर्थाने समृद्ध भारत घडेल.”
दंडकारण्य अभियान हे फक्त एक वृक्षलागवड उपक्रम नसून, ही एक चळवळ आहे – पर्यावरणाबाबत जागरूकतेची, सजीव सृष्टीच्या रक्षणाची आणि पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याची.
📌 विशेष:
✅ वृक्षारोपण + गीतसंगीत = हरित संस्कृतीचा अनोखा संगम
✅ विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेमाची बीजे रुजविण्याचे कार्य
✅ संगमनेर ते सप्तशृंगी – वृक्षसंवर्धनाचा पल्ला विस्तारतोय…
