शिवसेना पक्ष माळी समाज क्रांतीसेना महाराष्ट्र राज्य खजिनदारपदी विनायक टिळेकर यांची निवड
निमागव जाळी : अशोक गोसावी
माळी समाज संघटित करून सामाजिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ठाणे येथे शिवसेना पक्ष माळी समाज क्रांतीसेना महाराष्ट्र राज्याची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत निमगाव जाळी (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले विनायक भास्कर टिळेकर यांची शिवसेना पक्ष माळी समाज क्रांतीसेना महाराष्ट्र राज्याच्या खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते विनायक टिळेकर यांना प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी टिळेकर यांच्या सामाजिक कार्याची, संघटन कौशल्याची आणि तरुणांमध्ये असलेल्या लोकप्रियतेची विशेष दखल घेतली. माळी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच समाजाला एकसंघ करण्यासाठी त्यांची भूमिका भविष्यात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विनायक टिळेकर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब, महाराष्ट्र राज्य जलसंधारण विभागाचे उपसचिव सतीशराव जोंधळे साहेब, चेअरमन अमोल भाऊ जोंधळे, उद्योजक किरण आरगडे, डॉ. मुकुंद जाधव, नितीन जोंधळे, विशाल थेटे, शरद घोडेकर, अशोक ढगे, रमेश भोसले आदी मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
निवडीनंतर बोलताना विनायक टिळेकर यांनी, “शिवसेना पक्ष माळी समाज क्रांतीसेनेच्या माध्यमातून समाजातील युवकांना संघटित करून त्यांना न्याय, हक्क आणि विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,” असे सांगितले. त्यांच्या या निवडीमुळे संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात माळी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
