*महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा अभिमान: खासदार शरद पवार*.

अशोक गोसावी  /  निमगाव जाळी

आजचा हा कार्यक्रम माझ्या कायम लक्षात राहणारा असून महात्मा गांधी विद्यालयातील एक वर्ष जीवनात खूप काही शिकवून गेले. या विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांची परंपरा आणि योगदान खूप मोठे असून मी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ नुकतेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यालयाचे १९५५-५६ या वर्षातील माजी विद्यार्थी देशाचे नेते, खासदार शरदचंद्रजी पवार साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी माजी सभापती व मंत्री दिलीप वळसे पाटील हे होते. यावेळी सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील अभिवादन स्थळाचे नूतनीकरण आणि दहावी १९८३ च्या बॅचकडून मिळालेल्या सहा लाख रुपये किंमतीच्या सायकल स्टॅन्डचे उद्घाटन शरद पवार साहेब व इतर मान्यवरांचे हस्ते झाले. सभास्थानी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी रयतगीत व स्वागतगीत सादर केले. याप्रसंगी विद्यार्थी वसतिगृह इमारत, कनिष्ठ महाविद्यालय इमारत आणि पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार सभागृहाच्या कोनशीलांचे अनावरण आणि उद्घाटन व भूमिपूजन शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के पाटील यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी डॉ. संभाजी डांगे, ॲड.भगीरथ शिंदे, चेअरमन चंद्रकांत दळवी, बाळासाहेब थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शरद पवारसाहेबांच्या मध्यस्थीने विद्यालयासाठी प्राप्त झालेल्या बारामती स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंटचे नितीन धोंडे, माजी विद्यार्थी सुरेश भागवत आणि १७ लाख रुपयांपेक्षा अधिक देणगी व सेवानिवृत्ती निमित्ताने प्राचार्य विनायक मेथवडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. राहाता राष्ट्रवादी काँग्रेस आणि गणेश कारखान्याचे माजी चेअरमन नारायण कारले व प्रभाकर निर्मळ यांनी पवार साहेबांचा सन्मान केला. अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने अमृतगाथा या विशेष अंकाचे प्रकाशन पवार साहेब व मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्ष भाषणातून दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, कर्मवीर अण्णा आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याचा समृद्ध वारसा जतन करण्याचे आव्हान केले. डिजिटल क्रांती आणि वर्ग तेथे डिजिटल बोर्ड हे पवार साहेबांचे स्वप्न रयतने प्रत्यक्षात उतरविले आहे, याचे समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष अरुण कडू, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, मीनाताई जगधने, ॲड.संदीप वर्पे, बाबासाहेब बोस, राजेंद्र चांदे, सुरेश बोलीज, शिवाजी भोर, वडजे बापू: दादाभाऊ कळमकर, प्रकाश निकम पाटील, सुधीर म्हस्के, किरण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे, प्रभाताई घोगरे, कमलताई म्हस्के, भीमराव आंधळे, अण्णासाहेब साबळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, डॉ. संजय नगरकर, प्रशांत बुद्धिवंत, मधुकर अनाप, प्राचार्य विनायक मेथवडे, दिलीप डहाळे, अंगद काकडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, संगीता सांगळे, डॉ. मोहन सांगळे, संजय डुबे, डॉ. संजय कांबळे, डॉ
प्रवीण बडदे, राजेंद्र म्हस्के आदींसह माजी विद्यार्थी आजी माजी रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवार साहेब यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आठवणींसह गोवा मुक्ती चळवळीनिमित्त प्रवरानगर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यासाठी संघर्ष केल्याची आठवण व्यक्त केली. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे दर दरवाजे खुले करण्याचा आदर्श विचार या विद्यालयातून राबवले जात असल्याबाबत त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. शेवटी उपाध्यक्ष अरुण कडू यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!