भारत-कॅनडा मधील वाढता तणाव
लोकवेध live न्यूज
मागच्या काही वर्षांपासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडत चालले होते. खलिस्तानी समर्थकांना कॅनडामध्ये आश्रय दिला जातो, हे दोन्ही देशातील संबंध बिघडण्यामागच मुख्य कारण आहे. आता दोन्ही देशातील तणाव टिपेला पोहोचला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या जी २० परीषदेसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत हस्तांदोलन व परस्पर सहकार्याची चर्चा करताना ते दिसून आले होते. कॅनडाला पोहोचल्यावर अवघ्या १० दिवसातच त्यांनी भूमिका बदली असून भारता विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. जस्टिन ट्रुडो यांनी दहशतवादी संघटना खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकऱणी मोठं विधान केलंय. जस्टीन ट्रुडो यांनी सांगितलं की, भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांच्या कनेक्शनचा तपास देशाच्या सुरक्षा संस्था करत आहेत. ओटावात हाउस ऑफ कॉमन्सला संबोधित करताना जस्टीन ट्रुडो म्हणाले की, कॅनडाची सुरक्षा संस्था भारत आणि निज्जरच्या हत्या प्रकरणाचे कनेक्शन आहे का याचा वेगाने तपास करत आहे. भारत सरकारचे म्हणणे आहे की कॅनडा आपल्या भूमीवरुन खलिस्तानी कारवायांना आळा घालण्यात अपयशी ठरला आहे. इतकंच नाही तर त्यांना उघडपणे पाठिंबाही दिला आहे. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांनंतर कॅनडाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खलिस्तान समर्थकांनी कट रचण्यास सुरूवात केली असून यामुळे तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसोबतच डिप्लोमॅट्स आणि भारतीय दूतावासाला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.
पंतप्रधान ट्रूडो यांच्या वक्तव्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी सोमवारी ब्रिटिश कोलंबियातील एका गुरुद्वारामध्ये बैठक घेतली आणि भारताविरोधात मोठा कट रचण्याची तयारी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरू नानक शीख गुरुद्वारा कौन्सिल ऑफ सरे, ब्रिटिश कोलंबियाचे प्रवक्ते सरदार मोनिंदर सिंग यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. यावेळी, मोनिंदर सिंग आणि इतर काही खलिस्तानी आणि अतिरेक्यांनी एकत्रितपणे २५ सप्टेंबर रोजी कॅनडातील भारतीय समर्थक, येथील डिप्लोमॅट्स आणि त्यांच्या कुटुंबियांसह सर्व कॅनडाचे हायकमिशन आणि वाणिज्य दूतावासांसमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याची तयारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीही माहिती आहे की या संपूर्ण निदर्शनांना कॅनडाचे अनेक माजी खासदार,नेते तसेच काही अतिरेकी आणि खलिस्तान समर्थक पुढे घेऊन जात आहेत.
जस्टिन ट्रुडो यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावरून ३ वर्षांपुर्वी सुद्धा असाच वाद निर्माण झाला होता. यावेळी ‘जगात कुठेही शांतीपूर्ण मार्गानं आंदोलन होत असेल तर कॅनडा नेहमीच त्यांच्या अधिकारासाठी त्यांच्यासोबत उभा असेल. या प्रकरणांत तोडगा काढण्याच्या दिशेनं उचललेले पाऊल आणि संवादांप्रती आम्ही नेहमीच आशादायी राहू’ असं जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलं होतं. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाचारण करून, इतर देशांचा भारताच्या अंतर्गत बाबींत केल्या जाणारा हस्तक्षेप बद्दल समज दिली होती. शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि इतर नेत्यांच्या वक्तव्यांवर भारतानं नाराजी व्यक्त केली होती. ‘भारताच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप सहन करण्यायोग्य नसल्याची’ तिखट प्रतिक्रिया भारतानं दिली होती. तरीसुद्धा जस्टिन ट्रुडो आपल्या मतावर ठाम होते.
*कोण आहे हरदीप सिंह निज्जर?*
हरदीप हा भारतामध्ये वॉन्टेड दहशतवादी होता. भारतात वाँटेड असलेल्या निज्रचा १८ जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांत असलेल्या सरे शहरात या वर्षी जूनमध्ये पार्किंगमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली. त्याचा जन्म पंजाब राज्यातील जालंधरमध्ये असलेल्या हरसिंगपूर गावात झाला होता. त्यानंतर तो १९९५ मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झाला होता. त्याने कॅनडाचे नागरिकत्व घेतले होते. निज्जर सरेमध्ये गुरु नानक सिख गुरुद्वाराचा अध्यक्ष होता. गेल्या काही वर्षांत तो बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनांच्या संपर्कात आला. त्यानंतर तो हिंसाचार, विंध्वसक कारवायामुळं चर्चेत आला होता. कॅनडात स्थित असलेला निज्जरवर भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपा होता. निज्जर हा २००७ मध्ये लुधियानामधील शिंगार सिनेमा बॉम्बस्फोट तसेच २००९ मध्ये पटियाला येथे राष्ट्रीय शीख संघाचे अध्यक्ष रुल्डा सिंग यांच्या हत्येसह अनेक हाय-प्रोफाइल गुन्ह्यांमध्ये अडकला होता. त्यामुळे तो सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर होता. भारताविरुद्ध कट रचण्यात आणि दहशतवादी कारवाया केल्याबद्दल एनआयएने त्याच्याविरुद्ध आरोपपत्रदेखील दाखल केले होते. भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेनं २०२२ मध्ये त्यांच्या नावावर १० लाख नावांचं बक्षीस ठेवलं होतं.
काय आहे खलिस्तान चळवळ ?
खलिस्तान समर्थक खलिस्तान नावाच्या वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेल्या शीख स्थलांतरित ही मोहीम परदेशी मदतीने चालवत आहे. भारताचे तुकडे करण्याचा मानस त्यांचा आहे. पंजाब राज्य आणि आजूबाजूच्या हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे विलीनीकरण करून खलिस्तान देश तयार करायचा आहे. यात पाकिस्तानमधील पंजाबचा देखील समावेश आहे. खलिस्तानची राजधानी लाहोर करण्याचा खलिस्तान वाद्यांचा मानस आहे. खलिस्तान हा शब्द पहिल्यांदा १९४० मध्ये वापरण्यात आल्याचे सांगितले जाते. १९५५ मध्ये शीखबहुल राजकीय पक्ष अकाली दलाने भाषेच्या आधारावर राज्याच्या पुनर्रचनेसाठी चळवळ सुरू केली. अकाली दलाने राज्याचे पंजाबी आणि बिगर पंजाबी भाषिक भागात विभाजन करण्याची मागणी केली. जेव्हा ही मागणी वाढू लागली. तेव्हा १९६६ मध्ये इंदिरा गांधींनी पंजाबचे तीन भाग केले आणि पंजाब, हरियाणा राज्य आणि चंदीगडला केंद्रशासित प्रदेश बनवले. पंजाब सरकारला संरक्षण, परराष्ट्र, दळणवळण आणि चलन वगळता सर्व अधिकार देऊन स्वायत्त करण्याची मागणीही अकाली दलाने केंद्र सरकारकडे केली होती, ती इंदिराजींनी फेटाळली होती. ९८० च्या दशकात खलिस्तान चळवळीने पुन्हा एकदा वेग घेतला होता. त्यावेळच्या दमदमी टकसालचे प्रमुख जर्नेलसिंग भिंद्रनवाला यांनी याचे नेतृत्व केले. भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली खलिस्तान समर्थकांनी शस्त्रे गोळा करून सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला. या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी केंद्र सरकारने १ जून १९८४ रोजी ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम राबविली. यामध्ये लष्कराचे ८३ जवान आणि ४९२ नागरिकांचा मृत्यू झाला. या कारवाईत भिंद्रनवाला मारला गेला आणि सुवर्ण मंदिर अतिरेक्यांपासून मुक्त झाले. या घटनेमुळे जगभरातील शीख समुदाय दुखवला गेला. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे इंदिरा गांधींना शीखविरोधी मानले गेले. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली.
१९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यापूर्वी ऑपरेशन ब्लॅक थंडर (१९६८ आणि १९८८) नंतर खलिस्तान चळवळ दडपली गेली. सध्या भारतातील खलिस्तान चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. पंजाबच्या शहरी किंवा स्थानिक लोकसंख्येमध्ये त्याचा प्रभाव शून्य आहे. परंतु कॅनडा, ब्रिटन किंवा अमेरिकेत राहणाऱ्या शीखांकडून या चळवळीला अरधिक रसद तसेच वैचारिक पाठिंबा दिला जत आहे. सध्या भारतातील खलिस्तान चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. पंजाबच्या शहरी किंवा स्थानिक लोकसंख्येमध्ये त्याचा प्रभाव शून्य आहे. परंतु कॅनडा, ब्रिटन किंवा अमेरिकेत राहणाऱ्या शीखांकडून या चळवळीला अरधिक रसद तसेच वैचारिक पाठिंबा दिला जत आहे.
*भारत-कॅनडा संबंध कधी ताणले गेले ?*
भारतानं मे १९७४ मध्ये राजस्थानात पोखरण परमाणू परीक्षण केलं. यामुळे कॅनडा सरकार नाराज झाली होती. भारताला शांती प्रस्थापित करण्यासाठी परमाणू ऊर्जासाठी रिएक्टर्स दिले होते. परंतु भारतानं कॅनडाच्या रिएक्टर्सचा वापर पोखरण परमाणूसाठी केला. त्यावेळी पियरे ट्रूडो कॅनाडाचे पंतप्रधान होते आणि ते भारतावर नाराज झाले होते. त्यानंतर भारत आणि कॅनडासोबतचे संबंध खराब होऊ लागले. त्याचवेळी भारतात खालिसतान आंदोलन वाढू लागलं होतं. राजकीय शोषण होत असल्याचं सांगत अनेक शिख लोकांनी कॅनाडामध्ये आश्रय घेतलं होतं. यात एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब विस्फोट करणारा खालिस्तानी दहशतवादी तलविंदर सिंह परमार देखील होता. दरम्यान इंदिरा गांधीच्या सरकारनं परमार यांचे भारतात प्रत्यार्पण करण्यात यावे अशी मागणी केली होती. परंतु पियरे टुडो यांनी त्यास नकार दिला. त्यापासून भारत आणि कॅनाडाच्या संबंधात तेढ निर्माण झाली आहे. नाडानं जस्टीन ट्रूडो सरकारनं भारतासोबतच्या व्यापार कारण न सांगता बंद केला होता. त्यानंतर कॅनाडातील वाढता खलिस्तानी संघटनेवर ट्रूडो सरकार काही करत नसल्यानं भारतानं कठोर शब्दात तेथील सरकारलं सुनावलं होतं.
*भारत-कॅनडा व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता :*
या दोन्ही देशातील संबंध खराब असले, तरी दोन्ही देशातील व्यापार मात्र चांगला आहे. कूटनीतिक स्तरावर जो तणाव निर्माण झालाय, त्याचा परिणाम आता व्यापारावर होणार आहे. भारत आणि कॅनडामध्ये आयात-निर्यात बरोबरीची आहे. वित्त वर्ष २०२२-२३ मध्ये भारताने कॅनडाला ४.१० अब्ज डॉलरच सामान निर्यात केलं. तेच कॅनडाने भारताला २०२२-२३ मध्ये ४.०५ अब्ज डॉलरच सामान निर्यात केलं. भारत आणि कॅनडामध्ये व्यापार प्रक्रिया सहजसोपी असल्याने भारताने मोठी गुंतवणूक सुद्धा केली आहे. कॅनडाच्या पेंशन फंडाने भारतात ५५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केलीय. कॅनडाने वर्ष २००० पासून आतापर्यंत भारतात ४.०७ अब्ज डॉलरची थेट गुंतवणूक केलीय. भारतात सध्या ६०० कॅनडीयन कंपन्या काम करत आहेत. एक हजार कंपन्या भारतात एन्ट्री करण्यासाठी रांगेत आहेत. भारतीय आयटी कंपन्यांना कॅनडामध्ये मोठा व्यवसाय आहे. त्याशिवाय सॉफ्टवेअर, नॅच्युरल रिसोर्सेज आणि बँकिंग सेक्टरमध्ये भारतीय कंपन्या सक्रीय आहेत. कॅनडा भारताकडून आभूषण, महागडे दगड, फार्मा प्रोडक्ट, रेडिमेड गारमेंट, ऑर्गेनिक केमिकल्स, लाइट इंजीनियरिंग सामान आणि आयर्न अँड स्टील प्रोडक्ट प्रामुख्याने विकत घेतो. त्याचवेळी कॅनडा भारताला डाळी, न्यूजप्रिंट, वुड पल्प, एस्बेस्टस, पोटाश, आयरन स्क्रॅप, खनिज आणि इंडस्ट्रियल केमिकलची विक्री करतो. या वादामुळे दोन्ही देशातील या व्यापार संबंधांवर परिणाम होवू शकतो. या पार्श्वभूमीवर कॅडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी माध्यमांशी बोलताना आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण चिघळवण्याचा आपला कोणताही विचार नव्हता, असं ट्रुडो म्हणाले आहेत. पण भारत सरकारने या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहाण्याची गरज आहे.

सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२
