गंगामाई घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर शहराच्या लगत असणाऱ्या गंगामाई घाटावर दोन विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि.24 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात आदित्य रामनाथ मोरे (वय-17 रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व श्रीपाद सुरेश काळे (वय- 17 रा. कोळवाडे, ता. संगमनेर) यांचा मृत्यू झाला आहे. अवैध वाळुमुळे झालेल्या खड्ड्यांमुळे पाण्यात ठाव लागला नाही त्यामुळे दोघे अचानक एका खोल खड्ड्यात गेले आणि त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदित्य व श्रीपाद हे दोघे शिक्षण घेत होते. ते कॉलेजच्या मित्रांसोबत एकत्रितपणे दुपारच्यावेळी घुलेवाडी परिसरात एकत्रीत बसले. मित्रांनी मिळुन प्रवरा नदीवर पोहायला जाण्याचा निर्णय घेतला. ते आपापल्या गाडीवर गंगामाई घाटावर आले आणि गर्मी थंड करण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. यावेळी त्यांना पाण्याचा फारसा ठाव लागला नाही. गंगामाई घाटावर नदीच्या कडेला पाणी कमी असून जसजसे आत जाऊ तसतसे पाणी पात्र खोल होत गेले आहे.
दरम्यान, सर्व मित्रकडेला पोहत होते. मात्र, आदित्य व श्रीपाद हे संतगतीने असणाऱ्या खड्ड्याकडे गेले एका ठिकाणी खोल गर्त्यात सापडले. जेव्हा या दोघांच्या नाका तोंडात पाणी जायला सुरूवात झाली तेव्हा यांनी गटांगळ्या खाल्ल्या. वाचवा, वाचवा म्हणून आवाज देखील दिला. मात्र, ठाव न लागल्याने दोघांना पुरेसा श्वास घेता आला नाही. त्यामुळे, दोघांना मृत्यूला सामोरे जावा लागले. काल अकोल्यातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आता पुन्हा संगमनेरातील दोन युवकांचा प्रवरा नदीपात्रात पाण्यात बुड्डुन मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका हळहळ व्यक्त करत आहे. खरंतर, सुगाव बु येथील घटनेतील दोन व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रवरा नदीत सोडलेले आवर्तन बंद केले होते. तरी देखील संगमनेरातील दोन युवक पाण्यात बुडून मृत्यू झाले.
