उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कृषी अभि यांत्रिकी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
उच्च स्तरीय समिती स्थापन करू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिल्यानंतर ५० दिवसांनी कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
जर पुढील 15 दिवसात समिती स्थापन झाली नाही तर विद्यार्थी पुन्हा आंदोलन साठी उतरतील आणि तेव्हा आंदोलन हे खूप तीव्र स्वरूपाचे असेल
राहुरी प्रतिनिधी / लोकवेध live न्यूज
दिनांक २५ जानेवारी २०२३ पासून चारही कृषि विद्यापीठात कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू होते. दिनांक १४/०३/२०२३ रोजी मुंबई येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या उपस्थितीत कृषि अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने मा. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली. मा. उपमुख्यमंत्री यांनी कृषि अभियंत्यांच्या सर्व मागण्या समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात लवकर उच्च स्तरीय समिती स्थापन करून कृषि अभियंत्यांना न्याय देऊ असे आश्वासन यावेळी दिले आणि कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सुरू असलेले धरणे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली.

महाराष्ट्र राज्य कृषि अभियांत्रिकी संघटना कृषि अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहेत. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सुरूवातीपासून कृषि अभियंत्यांच्या सर्व मागण्या समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला व सर्व मागण्यांचा सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. भविष्यात कृषि अभियंत्यांना पुर्ण न्याय मिळवून देईपर्यंत खंबीर पाठिंबा देण्याचे आणि कृषि अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे यासाठी सर्व कृषि अभियंते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे खुप ऋणी आहेत.
कृषि अभियंत्यांच्या सर्व मागण्या समजून घेऊन ५० दिवस चाललेल्या आंदोलनादरम्यान सर्व कृषि विद्यापीठांच्या मा.कुलगुरू, मा. अधिष्ठाता, मा. सहयोगी अधिष्ठाता, मा. कुलसचिव आणि प्रशासन यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. विद्यापीठ प्रशासनाने जे सहकार्य केले त्यासाठी सर्व कृषि अभियंते सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहेत.
