माजी मंत्री सुनील केदार यांना रणजितसिंह देशमुख यांचे सांत्वन — स्व. लीलाबाई केदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
नागपूर (प्रतिनिधी) :
महाराष्ट्राचे माजी दुग्धविकास मंत्री मा. सुनील केदार यांच्या मातोश्री लीलाबाई छत्रपाल केदार यांच्या निधनाने केदार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खद प्रसंगी आज महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे मा. अध्यक्ष तसेच राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी नागपूर येथे सुनील केदार यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे मनापासून सांत्वन केले.
देशमुख यांनी केदार कुटुंबीयांशी संवाद साधत मातृवियोगाच्या या कठीण प्रसंगी आपली सहवेदना व्यक्त केली. त्यांनी स्व. लीलाबाई केदार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी वातावरणात हळहळ आणि भावनिकता दाटून आली होती.
स्व. लीलाबाई केदार या अत्यंत संयमी, संस्कारसंपन्न आणि समाजाभिमुख स्त्री म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या संस्कारांचा ठसा मा. सुनील केदार यांच्या सार्वजनिक जीवनात नेहमीच दिसून येतो. घरातील ममतेचा आणि समाजसेवेचा संगम म्हणजे लीलाबाई केदार असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
या भेटीवेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. विलास शिंदे, मर्चंट बँकेचे संचालक श्री. शामभाऊ भंडागे तसेच समाजसेवक राजेंद्र देशमुख उपस्थित होते. सर्वांनी मिळून स्व. लीलाबाई केदार यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबियांना धैर्य देण्याची प्रार्थना केली.
या प्रसंगी रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले की, “मातृवियोग हा जीवनातील सर्वांत मोठा आघात असतो. लीलाबाई केदार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या मूल्यांचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”
