म्हाळुंगी पुलाच्या बांधकामासाठी ६ कोटींचा निधी मंजूर
आमदार अमोल खताळ यांनी दिली माहिती
संगमनेर/ प्रतिनिधी
म्हाळुंगी नदीवर वेल्हाळे गावठाण ते राजापूर रस्ता ते निमगाव भोजापूर रस्ता, गणपती मळ्याजवळ जोडणारा पूल बांधण्याच्या कामासाठी नाबार्ड ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत संगमनेरला ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना आमदार खताळ म्हणाले, संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ, सुरक्षित आणि दर्जेदार व्हावी यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत आहे. शासनस्तरावरून तालुक्यातील अनेक प्रलंबित रस्त्यांच्या कामांना कोट्यवधींचा विकास निधी मंजूर करून आणण्यात यश मिळाले आहे. आता वेल्हाळे-राजापूर-निमगाव भोजापूर परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपयांचा निधी नव्याने मंजूर करण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आलेल्या या पुलाच्या होणार्या कामामुळे घुलेवाडी आणि धांदरफळ गटातील वेल्हाळे – राजापूर – निमगाव भोजापूर – गुंजाळवाडी – चिकणी या पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रवास सुलभ होऊन मोठा फायदा होणार आहे. शासनाच्या विविध विभाग आणि योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या कानाकोपर्यापर्यंत विकासकामे पोहोचवण्याचा संकल्प घेऊन काम करत आहे. वेल्हाळे-राजापूर-निमगाव भोजापूर परिसरातील शेतकरी, शाळकरी मुले, ग्रामस्थ आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात येताच; यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. त्यानुसार निधी मंजूर करण्यात आला असून लवकर पुलाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
दरम्यान, पाठपुराव्याची तत्काळ दखल घेऊन संगमनेरच्या ग्रामीण विकासाला गती देणार्या महत्वाच्या कामांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार अमोल खताळ यांनी आभार मानले आहेत.
……………………………………….
