सुगम्‍य भारत अभियानाच्‍या माध्‍यमातून विकासाची प्रक्रीया पुढे घेवून जाण्‍यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द : ना रामदास आठवले 

लोणी / लोकवेध live न्यूज 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सारखे सक्षम नेतृत्‍व देशाला पुढे घेवून जाण्‍याचे काम करीत आहे. त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखालीच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्‍याय देण्‍याची भूमिका केंद्र सरकार करीत असून, सुगम्‍य भारत अभियानाच्‍या माध्‍यमातून विकासाची प्रक्रीया पुढे घेवून जाण्‍यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्‍याय राज्‍य मंत्री रामदास आठवले यांनी केले.

केंद्रीय आधिकारीता मंत्रालय आणि सामाजिक न्‍याय विभागाच्‍या माध्‍यमातून दिव्‍यांग व्‍यक्तिंना खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून १ हजारांहून अधिक दिव्‍यांग व्‍यक्‍तिंना मंजुर झालेल्‍या साधन साहित्‍याचे मोफत वितरण मंत्री रामदास आठवले यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालीमठ, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, जिल्‍हा समाज कल्‍याण आधिकारी राधाकिसन देवडे, डॉ.अभिजित दिवटे, विजयराव वाकचौरे , बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, प्रकाश लोंढे, पप्‍पू बनसोडे , आशिष शेळके , भिमा बागुल , चांगदेव जगताप ,चद्रकांत सरोदे , राजेंद्र गवांदे आदी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात ना.आठवले म्‍हणाले की, सामाजिक न्‍याय विभागाच्‍या माध्‍यमातून सुगम्‍य भारत अभियान सुरु करण्‍यात आले असून, यामध्‍ये आता २१ श्रेणी निर्माण करण्‍यात आल्‍या आहेत. या माध्‍यमातून दिव्‍यांगांना न्‍याय मिळवून देताना देशातील १ हजार ३१४ सरकारी भवन हे सुगम्‍य बनविण्‍यासाठी पुढाकार घेण्‍यात आला आहे. ३५ अंतरराष्‍ट्रीय विमानतळ, ७०९ रेल्वेस्‍टेशन, ६१४ वेबसाईट, १९ समाचार चॅनल तसेच ८ लाख शाळा यासर्व सुविधांनी परिपुर्ण करण्‍यासाठी पुढाकार घेण्‍यात आला आहे.

राज्‍यातही आमच्‍या विभागाने समाज घटकांच्‍या उन्‍नतीसाठी २ लाख ४४ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला असून, आत्‍तापर्यंत राज्‍यातील ५ हजार ९९३ विद्यार्थ्‍यांना शिष्यवृत्‍तीसाठी सहकार्य केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. राज्‍यातील जिल्‍हा पुर्नवसन केंद्र तसेच कौशल्‍य विकास योजनेकरीताही केंद्र सरकारने निधीची उपलब्‍धता करुन दिली असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन, आठवले म्‍हणाले की यु.डी.आय.ए योजनेच्‍या माध्‍यमातून १७ लाख दिव्‍यांग व्‍यक्तिंना कार्डचे वितरण करण्‍यात आले आहे.

समाजातील प्रत्‍येक घटकाला न्‍याय मिळावा हीच भूमिका केंद्र सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्‍यांग व्‍यक्‍त‍ि‍करीता सातत्‍याने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्‍यांचे सक्षम नेतृत्‍व देशाला पुढे घेवून जात असून केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्‍यायाचे काम होत आहे. भविष्‍यात दिव्‍यांगाच्‍या आरक्षणाच्‍या बाबतीतही सरकार संवेदनशिल असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात या योजनेच्‍या अंमलबजावणीची पार्श्‍वभूमी विषद करुन, यापुर्वी जेष्‍ठ नागरीकांसाठी वयोश्री आणि आता दिव्‍यांग व्‍यक्तिंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली पालकत्‍वाची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची आहे. आजपर्यंत समाजातील या घटकांचा कोणीही विचार केला नव्‍हता. जिल्‍ह्यातही या योजनेची अंमलबजावणी प्राधान्‍याने आपण केली. अनेकजण कित्‍येक वर्षे सत्‍तेत राहीले, परंतू दिव्‍यांगाची त्‍यांना आवठण झाली नाही.
विखे पाटील कुटूंबियांनी या व्‍यक्तिंच्‍या विकासाकरीता सातत्‍याने पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्‍या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. भविष्‍यात आता या दिव्‍यांग व्‍यक्तिंना डोल उप‍लब्‍ध करुन देण्‍यासाठी आपण पुढाकार घेणार असून, या व्‍यक्तिंना नोक-यांमध्‍ये आरक्षण सुध्‍दा असावे यासाठी सुध्‍दा आता पाठपुरावा करणार असल्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.
खासदार सदाशिव लोखंडे यांनीही केंद्र सरकारच्‍या योजनेचे कौतूक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यामाध्‍यमातून वंचितांना न्‍याय मिळवून देण्‍याचे काम होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!