शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य, विखे-पाटलांकडून बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बागेश्वर बाबांचं साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य
यापूर्वीही बागेश्वर बाबा यांनी वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यं केल्याचे प्रकार घडले आहेत. साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट

बागेश्वर बाबा धार्मिक तेढ निर्माण करतायत
सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी महाराजांचे थोतांड

 

शिर्डी : लोकवेध live न्यूज /अण्णासाहेब काळे

 

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळेसातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबां विषयी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. शास्त्रींच्या या वक्तव्यामुळे साई भक्तांमधून संतापाची लाट उसळली असुन ठिकठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे. धिरेंद्र शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिर्डीचे आमदार तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी महाराजांचे थोतांड असल्याचे म्हणत धीरेंद्र शास्त्रींवर परखड टीका केली आहे. ते रविवारी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

यावेळी विखे पाटील बोलताना म्हणाले की,अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान ते स्विकारू शकत नाहीत.बाबालोक देवाचे रूप घेऊन लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करताहेत.अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहीजे. हेच बाबा धार्मिक तेढ निर्माण करताहेत, सामाजिक अशांतता निर्माण करताहेत. साईबाबांनी माणसांमध्ये देव बघितला होता. साईबाबांनी ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा आणि सबुरीचा’ महामंत्र जगाला दिलाय. कुणाच्या श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार कुणालाही नाही. महाराष्ट्र संतांची भूमी आहे.संतांनी समाज उभा करण्याचं काम केलंय. त्या संतांमध्येच आम्ही देव बघतो. तथाकथित महाराजांनी वाचाळपणा बंद झाला पाहिजे. तुम्हाला काय धर्माचा प्रचार करायचा तो चार भिंतीत करा. दुसर्‍याचा अवमान करण्याचा अधिकार नाही. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे देखील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले?

बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या देवत्ताविषयी शंका उपस्थित केली. यावेळी बागेश्वर बाबा यांनी साईबाबांची अक्षरश: खिल्ली उडविली. साईबाबा हे देव असू शकत नाहीत. हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य साईबाबांना देव मानत नाहीत. त्यामुळे सनातन हिंदू म्हणून मीदेखील साईबाबांना मानत नाही. गिधड की खाल पहनकर कोई शेर नही हो सकता, असे बागेश्वर बाबा यांनी म्हटले होते. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, पण साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही, असे उद्गार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काढले होते.

महाराष्ट्रासह देशभरात साईबाबांच्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आता याप्रकरणात बागेश्वर बाबा दिलगिरी व्यक्त करणार का त्यांच्यावर कारवाई केली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!