काँग्रेस नेते आ बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे- डॉ रावसाहेब कसबे

चिन्नण्णा पुस्तक प्रकाशन संपन्न

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण हे महाराष्ट्राच्या  परंपरेला न शोभणारे आहे . राज्याचे राजकारण पुन्हा चांगले होईल असा विश्वास व्यक्त करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची प्रगल्भता असून त्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळावे अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली आहे

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने बीएसटी महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात प्रा. हिरालाल पगडाल लिखित चिन्नण्णा पुस्तक प्रकाशन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी व्यासपीठावर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, डॉ संजय मालपाणी ,प्रा हिरालाल पगडाल, चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील, उत्कर्षा  ताई रुपवते, डॉ संतोष खेडलेकर, संदीप वाकचौरे, श्रीनिवास पगडाल आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ कसबे म्हणाले की, सध्याचे राजकारण हे न कळणारे आहे. मात्र राज्य आणि देशाच्या एकात्मतेसाठी लोकशाही व राज्यघटना आवश्यक असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता आहे. चांगले नेतृत्व समाजाला व देशाला पुढे घेऊन जाते.

इतिहास हा फक्त राजे राजवाडे यांचा नसून तो सर्वसामान्य माणसांनी निर्माण केलेला आहे. प्रत्येक माणसात इतिहास निर्माण करण्याची क्षमता असून प्रत्येकाने स्वतःला ओळखले पाहिजे. हिरालाल पगडाल यांनी विद्यार्थी दशेपासून वकृत्व स्पर्धा गाजविल्या असून पुरोगामी विचार जोपासला असून या विचाराची राज्याला गरज असून सौ दुर्गाताई तांबे व डॉ संजीव सोनवणे यांचे आत्मचरित्र आगामी काळात यावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.

तर आमदार थोरात म्हणाले की हिरालाल पगडाल यांच्या पुस्तकातून त्यांच्या संघर्षमय जीवनाची वाटचाल कळतेच .परंतु संगमनेर तत्कालीन सामाजिक परिस्थिती ही समजते. सध्या सर्वत्र अस्थिरता असताना राज्यघटनेवर विश्वास असणारा विचारच देशाला तारू शकेल असा विश्वास व्यक्त केला

तर कुलगुरू डॉ सोनवणे म्हणाले की, सामान्य माणसंच इतिहास निर्माण करतात. संघर्षाची कथाही लहान माणसापासून सुरू होते आणि संघर्षावर मात करणारे मोठे होतात तर मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की, या पुस्तकातून तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थितीची माहिती मिळते. यावेळी सौ दुर्गाताई तांबे, डॉ संजय मालपाणी, उत्कर्षा ताई रूपवते यांचीही भाषणे झाली .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुनीता पगडाल यांनी केले सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले तर सूर्यकांत शिंदे यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!