विद्यार्थ्यांचा भावनिक व मानसिक विकास महत्त्वाचा – डॉ. खेडेकर
संगमनेर / लोक वेध live न्यूज
देशात व राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाला सुरुवात होत असतानाच ११वी , १२वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच भावनिक व मानसिक विकास झाल्यास आदर्श नागरिक तयार होतील असे प्रतिपादन शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांनी शहरातील आयएसओ प्रमाणित गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डी एम पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी प्रतिनिधी शपथ ग्रहण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या कार्यकुशल प्राचार्या डॉ. अस्मिता देशपांडे यासह इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड , प्रा. परेश सांगवीकर उपस्थित होते. ईशस्तवन , स्वागत गीत व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थी प्रतिनिधींची ओळख परेड संचालन क्रीडा शिक्षक मदन जेधे यांनी सादर केले. शिस्त व विद्यार्थीप्रिय प्रा. भाऊसाहेब मांढरे यांनी वर्गनिहाय नियुक्त वर्ग प्रतिनिधींना शपथ दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांची शिस्त व जबाबदारीच्या जडणघडणी व वागणुकीबाबत महाविद्यालयाचे इन्चार्ज प्रा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणात खेडेकर मॅडम पुढे बोलताना म्हणाल्या की, १६ ते १८ हा विद्यार्थ्यांच्या भावनिक व मानसिक विकासाचा वयोगट आहे या वयोगटातच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होत असतात वर्ग प्रतिनिधींनी जबाबदारीने आपापल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करावे असे सांगून सर्व नवनियुक्त वर्ग प्रतिनिधींचे अभिनंदन करून उत्तम नियोजनाबाबत सर्व सहकाऱ्यांचेही कौतुक केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. अस्मिता देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. एस व्ही शिंदे यांनी करून आभार प्रा. स्वप्निल शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
