समाजोन्नतीसाठी नवदृष्टी – मधुसूदन गांधी यांचा प्रेरणादायी अंबाजोगाई दौरा
नवचेतना शिबिर, व्यापारी प्रदर्शन आणि महाकुंभाबाबत मार्गदर्शन
अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री
“समाजात नवचैतन्य निर्माण करून महिला, युवक आणि व्यापाऱ्यांना सक्षम करणे हेच खरे नेतृत्व!” – अशा प्रेरणादायी विचारांनी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मा. मधुसूदन गांधी यांनी अंबाजोगाईतील समाजबांधवांना सन्मानपूर्वक मार्गदर्शन केले. दिनांक २५ जुलै रोजी त्यांच्या दौऱ्यानिमित्त येथे उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी राजस्थानी मंगल कार्यालयात आयोजित विशेष संवाद सत्रात गांधी यांनी विविध उपक्रमांची माहिती देत समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. त्यांनी विशेषतः महिलांसाठी *ढालेगाव येथे आयोजित होणाऱ्या ‘नवचेतना शिबिरा’*चा उल्लेख करत, “समाजप्रबोधन आणि आत्मनिर्भरतेसाठी महिलांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे,” असे सांगितले.
युवकांना उद्देशून ते म्हणाले, “येत्या डिसेंबरमध्ये छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या एमटीएफ व्यापारी प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या उद्योग व्यवसायात वाढ साधा.” तसेच, संपूर्ण देशभरातून माहेश्वरी बांधव एकत्र येणाऱ्या जोधपूर आंतरराष्ट्रीय महाकुंभात समाजातील प्रत्येक घटकाने उपस्थित राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.
या दौऱ्यात गांधी यांच्यासोबत अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे संयुक्त मंत्री श्री. जुगलकिशोरजी लोहिया, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे संयुक्त मंत्री नंदकिशोर तोतला, जनसंपर्क मंत्री ओमप्रकाशजी तापडिया, मंत्री सत्यनारायणजी सारडा हेही उपस्थित होते.
कार्यक्रमास बीड जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अॅड. श्रीकृष्ण तोष्णीवाल, जिल्हा सचिव जगदीश जाजू, युवा जिल्हाध्यक्ष रोहन मुंदडा, महिला अध्यक्ष शिवकन्या रांदड, पुनम जाजू, तसेच नंदकिशोरजी मुंदडा, किरण भन्साळी, प्रीतम तापडिया, ललित बजाज, संतोष भंडारी, कांतीलाल चोकडा, विजय नावंदर, गुलाब सारडा, रामानुज मुंदडा, दत्तप्रसाद लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश तोष्णीवाल यांनी तर संचालन अमित रांदड यांनी केले. आभारप्रदर्शन विजय नावंदर यांनी मानले.
