वक्तृत्व कौशल्यांना नवे पंख देणारी स्पर्धा – १२ ऑगस्टला तालुकास्तरीय वक्तृत्व महोत्सव!
संगमनेर / लोकवेध live न्यूज
राष्ट्र सेवादल संगमनेर यांच्या वतीने, आदिवासी व दलित श्रमिकांचे झुंजार नेते साथी भास्करराव दुर्वे (नाना) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा काशेश्वर विद्यालय, कासारा दुमाला येथे संपन्न होणार असून, या विषयीची माहिती प्रकल्प प्रमुख सोमनाथ मदने यांनी दिली.
या स्पर्धेत एकूण ६ वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धा घेतल्या जाणार असून, इयत्ता तिसरी ते बारावी आणि खुला गट यांचा समावेश आहे. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे सादर करता यावेत यासाठी विविध वयोगटांनुसार समर्पक व विचारप्रवर्तक विषय निवडण्यात आले आहेत.
🗣️ स्पर्धेचे गट व विषय पुढीलप्रमाणे :
🔹 गट 1 – इयत्ता 3री ते 4थी:
– आई थकत असेल का?
– संत गाडगेबाबा
– नाती जपूया
– शेतकरी : जगाचा पोशिंदा
– माझ्या कल्पनेतील सुंदर शाळा
🔹 गट 2 – इयत्ता 5वी ते 6वी:
– बाप समजून घेऊया
– शेतीतील विज्ञान
– आपत्ती व्यवस्थापन – एक आव्हान
– स्वामी विवेकानंद आणि आधुनिक भारत
– व्यसनाधीनता : एक शाप
🔹 गट 3 – इयत्ता 7वी ते 8वी:
– वाचन संस्कृती व आपण
– माझी आवडती महिला संत
– निर्भय मी होणार
– वसा समतेचा : फुले, शाहू, आंबेडकरांचा
– शहीद भगतसिंग यांचे स्वप्नातील भारत
🔹 गट 4 – इयत्ता 9वी ते 10वी:
– संत आणि सामाजिक समतेचा विचार
– खरा तो एकची धर्म : जगाला प्रेम अर्पावे
– समाजवाद शक्य आहे
– साहित्य : प्रबोधनाचा मार्ग
– भारतीय संविधानाची ७५ वर्षे
🔹 गट 5 – इयत्ता 11वी ते 12वी:
– शिवाजी महाराजांचे स्वराज्य
– असा महाराष्ट्र घडवूया
– हुंडाबळी व नव्या विवाहाचे स्वरूप
– पर्यावरण स्नेही जगण्याकडे चला
– आरक्षण, जात आणि सामाजिक समता
🔹 गट 6 – खुला गट:
– आर्टिफिशियल इंटेलिजन्स : संधी की संकट?
– सामाजिक सुधारणा व माझा सहभाग
– मला समजलेले महात्मा गांधी
– आई-वडिलांचे आई-वडील होऊया
– चला जाती-धर्मा पलीकडे जगूया
🏆 बक्षिसे आणि वैशिष्ट्ये :
प्रत्येक गटात प्रथम क्रमांकासाठी रोख बक्षीस, तसेच स्मृतिचिन्ह व पुस्तकांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पहिल्या गटासाठी ₹५००, तर खुल्या गटासाठी ₹११०० चे प्रथम पारितोषिक असणार आहे.
स्पर्धकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गटात ५०% सहभाग मुलींचा असणे बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेतील दोन स्पर्धक एका गटासाठी सहभाग घेऊ शकतील.
प्रवेश शुल्क फक्त ₹२० असून, स्पर्धा प्रवेशिका लवकरात लवकर भराव्यात असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
🤝 सहकार्य संस्थांचे योगदान :
या उपक्रमासाठी सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था, भास्करराव नाना दुर्वे सहकारी पतसंस्था आणि आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
🙌 आवाहन :
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारमंथन, अभिव्यक्ती कौशल्य आणि समाजभान यांचा विकास होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाऊसाहेब शिंदे, राजाभाऊ अवसक व सहकाऱ्यांनी केले आहे.
📝 टीप:
विचार मांडण्यासाठी मंच, आत्मविश्वासासाठी संधी, आणि सामाजिक जाणीवेसाठी एक योग्य माध्यम म्हणजेच ही वक्तृत्व स्पर्धा.
“बोलून दाखवूया विचार, घडवूया नव्या पिढीचा आधार!”
